Advertisement

कापसाला प्रतिक्विंटल १५ हजार रूपये हमीभाव द्या: बिरसा फायटर्सची मागणी

कापूस दाखवत तहसीलदार यांना निवेदन

शहादा -कापसाला प्रति क्विंटल १५ हजार रुपये हमीभाव देऊन खरेदी करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,कृषी मंत्री अर्जून मुंडा,कृषी सचिव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,गोपाल भंडारी,सोमनाथ पावरा,सुरेश पावरा,सुशिलकुमार खर्डे,मोतीराम ठाकरे,सुभाष पाडवी, जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
               निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी जिल्ह्यात कापूस या नगदी पिकांचे लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पीक चांगले येऊन आर्थिक लाभ मिळावे, या आशेने शेतकरी कापसाची लागवड करतो. परंतु, सरकार योग्य हमीभाव देत नाही. व्यापारी अल्प दराने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करतांना दिसून येत आहे. गरीब शेतकरी कर्ज काढून, उसनवारीने पैसे घेऊन बी-बियाणे, औषधे, खते, मजूरी, लागवड खर्च व दिवसरात्र काबाडकष्ट करून जेमतेम पीक पिकवतो. आणि जेमतेम पिकवलेल्या पिकांला कवडीमोलाने खरेदी केली जाते. त्यामुळे केलेला खर्चही निघणे मुश्किल होत आहे.
                अनेक शेतकऱ्यांनी ३ते ४ महिन्यांपासून घरात साठवलेला कापूस विकून टाकला आहे. तर अद्याप काही शेतकरी कापसाचे दर पुन्हा वाढतील या अपेक्षेनं कापूस घरातच ठेवून आहेत. परंतु, आजही भाव जैसे थे असल्याने शेतकरी चिंतेत आहे. अगोदरच, अनियमित पाऊस व अस्मानी संकटाने पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होतात. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही. यावर्षी उत्पादन जेमतेम आहे व शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने देशाचा पोशिंदा वाढती महागाईमुळे आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्यांनी जगायचे कसे?
केंद्र व राज्य शासनाने कापसाला पाहिजे तेवढा भाव न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. प्रति एकर कमी उत्पादकता आणि उत्पादनाला चांगला भाव मिळालेला नाही; तर एकीकडे बी-बियाणे, औषधे, खते, मजूरी, लागवड खर्च व इतर जीवनावश्यक वस्तूंची किमती गगनाला भिडले आहे. यंदा कमी पावसामुळे कापसाच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत कापसाला योग्य बाजारभाव मिळणे अत्यावश्यक आहे, अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होतील.
आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून केंद्र/राज्य सरकारद्वारा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पिकांना हमीभाव देवू या वचनाचा विचार करून देशाचा पोशिंदा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कापूस पिकाला प्रति क्विंटल १५ हजार रुपये हमीभाव देऊन खरेदी करण्यात यावा.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने सरकारकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments