Advertisement

कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु करा

*काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र*

मुंबई, दि. २९ ऑक्टोबर २०२२

राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत असून परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश खरीपाची पीके अक्षरशः पाण्यात वाहून गेली आहेत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका ही पीके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यातल्या त्यात काही जिल्ह्यांमध्ये थोडासा कापूस आणि भाताचे पीक शेतक-यांनी मोठ्या कष्टाने वाचवले आहे. पण सरकारी खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे खासगी व्यापा-यांकडून लूट सुरु आहे. त्यामुळे सरकारने पुरेशी कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु करावीत आणि शेतक-यांची लूट थांबवावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. 
या संदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, एकीकडे अस्मानी संकटापासून पीक वाचवणा-या शेतक-याला सरकारी अनास्थेला ही तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या मा-यात आपल्या पोटच्या लेकरांपेक्षा जास्त काळजीने जपलेले पीक आता पूर्ण नाही पण काही प्रमाणात हाती आले आहे. पण सरकारने अद्याप पुरेशा प्रमाणात कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु केली नाहीत त्यामुळे शेतक-यांना खासगी व्यापा-यांनाच त्यांचा शेतमाल विकावा लागतो आहे. त्यातच धान खरेदीसाठी घातलेल्या ऑनलाईन नोंदणीच्या अटीमुळे शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. दुर्गम आदिवासी भागातील अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मालाची अद्याप खरेदी झाली नाही. यामुळे सरकारने या ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून तात्काळ पुरेशी केंद्र सुरु करावीत आणि शेतक-यांचा कापूस आणि धान खरेदी करून अडचणींतील शेतक-यांना दिलासा द्यावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Post a Comment

0 Comments