*मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आदिवासी विकास मंत्री ,आयुक्त यांना तहसीलदारांमार्फत निवेदन*
शहादा: शासकीय आदिवासी आश्रम शाळेत कला,क्रीडा व संगणक शिक्षकांची पुननिर्युक्ती करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आदिवासी विकास मंत्री,नाशिक आदिवासी विकास विभागचे आयुक्त यांना शहाद्याचे तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करन पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,आदिवासी विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत कंत्राटी कला,क्रीडा व संगणक पदभरती सन २०१८ व २०२९ मध्ये राबविण्यात आली होती. या पदभरतीत एकूण १५०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या शिक्षकांनी आपल्या अध्यापनाच्या जोरावर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रात राज्यात डंका गाजवला होता. आतापर्यंत शिक्षकांना एप्रिल २०२३ पर्यंत ५ वर्षे शिक्षकांना नियुक्तीचे आदेश मिळाले.परंतु सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षांत ९ महिने ऊलटून गेले तरी नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. राज्यभरात शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे.
सरकारला कला,क्रीडा व संगणक शिक्षकांची गरज नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.विद्यार्थांच्या शैक्षणिक नुकसानाला आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे.अनेक शिक्षक हे मोठ्या पगाराची नोकरी सोडून शासकीय आश्रमशाळेत नोकरीला लागले. पुनर्नियुक्ती आदेश न मिळत असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.म्हणून नव्याने बाह्य स्रोत पद्धतीने पदभरती न करता पहिले काम केलेल्या कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना प्राधान्य देऊन त्यांना सेवेत कायम करावे व तसे नियुक्ती आदेश द्यावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.
0 Comments